कोल्हापूर : यावर्षी पाचाड ते रायगड, अशी शटल सर्व्हिस सुरू करण्यात आल्याने शिवराज्याभिषेकास हजेरी लावण्याऱ्यांची अडचण दूर झाली आहे. महाड ते रायगड या मार्गात होणाऱ्या ट्रॅफिक जॅममुळे शिवभक्तांना दरवर्षी अडचणींचा सामना करावा लागतो. सहा जून रोजी शिवराज्याभिषेक असून, त्यानिमित्ताने अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था पाचाड परिसरात केली असून तेथून मिनी बसने शिवभक्तांना रायगडच्या पायथ्यापर्यंत सोडले जाणार आहे.
रायगडवाडी, निजामपूर, पाचाड परिसरात वाहने पार्क करण्यासाठी जागा आहे. पाचाड ते रायगडचा पायथा हे अंतर दोन किलोमीटर इतके आहे. समितीने पाचाडमधून शिवभक्तांना शटल सर्व्हिसद्वारे पायथ्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे. भक्त रोप-वेद्वारे दिवसभरात गडावर जाऊ शकतात. त्यामुळे शिवभक्तांनी गड पायथ्याखालून चालत गडावर जावे. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक यांना रोप-वेचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन सावंत यांनी केले आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्याला होणाऱ्या शिवभक्तांच्या गर्दीचा आकडा पाहता समितीने कंबर कसली आहे. समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत व कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांच्या नेतृत्वाखाली ४२ समित्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक समितीची जबाबदारी निश्चित केली आहे. देशभरातील शिवभक्तांच्या अडचणी समजून घेतल्या जात आहेत. त्यातील एक अडचण म्हणजे ट्रॅफिक जॅमची. दरवर्षी शिवभक्तांची रायगडावर गर्दी होत आहे. दुचाकी, चारचाकी, लक्झरी, एस.टी.ने शिवभक्त गडाच्या पायथ्याला येत आहेत. त्यामुळे महाड ते रायगड मार्गावर ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण होत आहे. काही शिवभक्तांना पाचाडमध्ये येऊनसुद्धा सोहळ्याला हजेरी लावता येत नाही.
होळीच्या माळावर असेल नियंत्रण कक्ष...
गडावरील होळीच्या माळावर समितीतर्फे नियंत्रण कक्ष कार्यरत असेल. गडावर वैद्यकीय सेवाही उपलब्ध केली असून, डॉक्टर्सही गडावर मुक्कामाला असतील. शिवभक्त, महिला, युवती यांना काही अडचण असल्यास त्यांनी कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे.